टोमॅटो खाणं बंद करा, किंमती कमी होतील; भाजपा मंत्र्याचा अजब सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Minister on Tomato: टोमॅटोचे (Tomato) भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून तो गायब झाला आहे. मध्यमवर्गीय टोमॅटोचे दर पुन्हा स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच आता, उत्तर प्रदेशच्या महिला विकास आणि बाल पोषण राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला यांनी लोकांना टोमॅटो खाऊ नका असा सल्ला दिला. टोमॅटो महाग असल्यास ते घरीच पिकवा किंवा ते खाणे बंद करा असं प्रतिभा शुक्ला यांनी म्हटलं आहे. प्रतिभा शुक्ला यांनी उत्तर प्रदेशच्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला आणि रोपे लावली. यावेळी त्यांनी हे विधान केलं. 

“जर टोमॅटो महाग झाले असतील, तर लोकांनी ते घरी पिकवले पाहिजे. जर तुम्ही टोमॅटो खाणं बंद केलं तर किंमती आपोआप कमी होतील. तुम्ही टोमॅटोच्या जागी लिंबूही खाऊ शकता. जर कोणीच टोमॅटो खात नसेल तर किंमती कमी होतील,” असं प्रतिभा शुक्ला म्हणाल्या आहेत.

आसाही गावातील पोषण उद्यानाचे उदाहरण देत उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी सांगितलं की, या महागाईवर उपाय आहे, तो म्हणजे टोमॅटो घरी लावा. ते नेहमीच महाग असतात आणि जर तुम्ही टोमॅटो खात नसाल तर लिंबू वापरा, जे जास्त महाग असेल ते टाकून द्या. ते आपोआप स्वस्त होतील.

“आसाही गावात आम्ही पोषण उद्यान उभारलं आहे. गावातील महिलांनी हे पोषण उद्यान सुरु केलं असून त्यात टोमॅटोही लावता येतील. या महागाईवर उपाय आहे, हे नवीन नाही, टोमॅटो नेहमीच महाग आहेत. टोमॅटो खात नसाल तर लिंबू वापरा. जे महाग असेल ते टाकून द्या, ते आपोआप स्वस्त होईल,” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी, ग्राहक व्यवहार विभाग टोमॅटोसह 22 जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या दैनंदिन किमतींवर लक्ष ठेवत असल्याची माहिती दिली. टोमॅटोच्या वाढत्या किंमती तपासण्यासाठी आणि ते परवडेल अशा किंमतीत ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी मंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गंत टोमॅटो खरेदी करत असून, त्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देत आहोत असं सांगितलं. 

राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (National Cooperative Consumers Federation) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (National Agricultural Cooperative Marketing Federation) आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र येथील बाजारपेठांमधून टोमॅटो खरेदी करत असून दिल्ली-एनसीआर, बिहार, राजस्थानसारख्या सर्वाधिक टोमॅटोचा वापर होणाऱ्या ठिकाणी परडवणाऱ्या किंमतीत पुरवत आहोत असं चौबे यांनी सांगितलं. 

Related posts